ठिणगी

Submitted by दाद on 6 January, 2009 - 22:36

मानसी घरात शिरली. गेले दोन दिवस अगदी जरूरीचं तेव्हढं आवरून बाबा जिथे शून्यात नजर लावून बसत होते, तिथेच आत्ताही बसले होते... आरामखुर्चीत. आतल्या खोलीत जाताना तिने आशेने बघितलं पण तिच्या नजरेला नजर मिळताच त्यांनी तोंड फिरवलं....
’दार लाव, आत जाण्यापूर्वी’, अतिशय कडवट दुखावल्या स्वरात त्यांनी तिला सांगितलं. तिला माहीत होतं तितक्या वर्षांत ह्या घरचंच काय पण चाळवजा ह्या बिल्डिंगमधल्या कुठल्यास घराचं दार, घरात माणसं असताना लावण्याची पद्धत नव्हती.

मानसी वळली आणि तिने दार लावलं, ’बाबा...’ तिनं बोलायचा प्रयत्नं केला पण तितक्याच कडवट स्वरात ते परत म्हणाले, ’आत जा...’
निमूटपणे मानसी आत आली.
वास्तविक सकाळची नऊ-दहाची वेळ म्हणजे आईची कोण गडबड असायची. बाबा, बल्ल्याचे डबे, कामवालीचं येणं, स्वयंपाक, सगळीच घाई. याक्षणी स्वयंपाकघरातल्या छोट्या पलंगाच्या कडेला ती डोक्याला हात लावून बसली होती.

बल्ल्या तिच्याशी जुजबी बोलून कॉलेजला गेला होता. पण एकूण प्रकाराने तोही बावचळला होता. मानसीने आपले कपडे घेतले आणि आंघोळीला निघाली, ’आई, आंघोळ करून....’

तिचं वाक्य पूर्णं होण्यापूर्वीच आईने ’कर काय हवं ते...’ अशा अर्थाचा हात हलवला.

बाथरूममधे कितीही प्रयत्नं केला तरी तिचे डोळे वहायचे थांबेनात. हातांच्या ओंजळीत चेहरा घेऊन खाली बसताना, तिच्या गुढग्यातून निघालेली कळ मस्तकात गेली... आणि मानसी ताठ उभी राहिली. तिने स्वच्छ डोळे पुसले. आणि आंघोळ उरकली.
कपडे घालण्यापूर्वी, खांद्यावर, डाव्या स्तनावरच्या काळ्या-निळ्या खुणांवर तिने हळूवार हाताने मलम लावलं. घरातला सुती पंजाबी ड्रेस घालून ती बाहेर आली. केस पुसून पंचा दोरीवर वाळत घातला.

’आई, काय मदत करू? भाजी देते चिरून, चालेल?’, मानसीने आईच्या उत्तराची वाट न बघता विळी घेतली आणि चवळीच्या निवडलेल्या शेंगा मुठीत घेऊन मान खाली घेऊन चिरायलाही लागली.

’मदत करतेस बायो? कर. मी सांगते ती मदत करशील?’ गेल्या काही तासांत पहिल्यांदाच फुटलेला आईचा आवाज ऐकून मानसीच्या घशात आवंढा आला. तिने नुस्तीच मान हलवली.

’.... परत जा. त्यांच्याकडे परत जा. लग्नं म्हणजे तुझे खेळ नव्हेत.... एका स्पर्धेत हरल्यावर दुसरीत भाग घ्याला..... एव्हढे उपकार कर आई-बापावर. तुला....’, आईचं बोलणं अजून पूरं व्हायचं होतं.... अर्ध्यावरच मानसीचा हात धसला विळीवर....
तिला कळलंच नाही बहुतेक, पण आई चित्कारली, ’अगं... केव्हढं कापून घेतलस....’

आईच्या बोलण्याकडे लक्षं न देता मानसीने स्वयंपाकघराचं दार बंद केलं, तसाच रक्तं गळणारा हात वर करून दिवा लावला..... आणि... आणि... डोक्यावरून कुर्ता काढला...

ह्यावेळी तोंडावर हात घेऊन आई जागच्या जागी थरथरत बघत राहिली... लाडा-कोडात वाढवलेल्या आपल्या कोवळ्या वेलीवरचे आघात... सहज दिसणार नाहीत असे... जबरदस्तीचे... पाशवी...

खांद्यावर, स्तनांवर दातांच्या खुणा.... मानसी स्थिर नजरेने आईकडे पहात होती. तिने सलवारच्या नाडीला हात घातला....
आई ओरडल्या, ’मने, थांब.... मनू, काय पोरी हे....’ त्यांना पुढे बोलवेना. त्यांनी पुढे होऊन तिला कुशीत घेतली आणि रडू लागल्या.
’कसं होणार तुझं.... कुठे तोंड दाखवणार आपण....’

मानसी वेगाने आईच्या कुशीतून बाजूला झाली. तिचा तोल सुटला. ती तारस्वरात किंचाळली, ’अजून तुला लोक काय म्हणतील ह्याचीच काळजी आहे? अजून? म्हणजे काय झालं की तू माझी काळजी करशील? मेले की? जीव घेतला त्यांनी तर करशील की... मी जीव दिल्यावर?.... बोल ना.... बोल आई.... आई’

बाबा जोरजोरात दार खडखडावत होते., ’काय चाललय? मानसी... दार उघड... दार उघडा आधी’

मानसीने कुर्ता घातला आणि दार उघडलं. बाबांचा आवाज वाढला होता. ’काय तमाशा लावलाय? झालं तेव्हढं पुरे नाही झालं? आता बिल्डिंगमधे शेजार-पाजार गोळा करायचाय..... काय सांगणारेस त्यांना?... काय बोल... लोकांच्या पोरी नवर्‍याने मारहाण केली म्हणून परत येतात.... माझी पोरगी नवर्‍याला मारहाण करून....

इतक्यात लोटलेला दरवाजा उघडून शेजारचे वैद्य, गोकर्णं आले. मागोमाग सामंत काकूही आल्या.
’बोल मने... बोल. कुठे तोंड लपवू आम्ही आता? जातीत, नातेवाईकांत जायची सोय राहिली नाही.... नादान.... नालायक... उरावर धोंड बनून रहाणार आहेस... आयुष्यभर... जीव घे आधी आमचा... मग...’, बाबांच संयम संपला होता, तोल सुटला होता. गेल्या दोन दिवसातलं सगळं सगळं गरळ होऊन बाहेर पडत होतं.

मानसीला सगळच असह्य झालं बहुतेक.... कारण क्षणात अख्खी खोली तिच्या भोवती फिरली आणि ती चक्कर येऊन पडली.

’अहो... काय असं... थांबा...’ ह्या पलिकडे आलेल्यांपैकी कुणालाच काही बोलायचं सुचेना.

एकमेकांच्या अडी-अडचणीला धावणार्‍या ह्या शेजार्‍यानी मग सगळं जरा ताब्यातच घेतलं. सामंतकाकूंनी कांदा ठेचून लावला. वैद्यांनी बाबांना आपल्या घरी ओढून नेलं. गोकर्णं इथेच थांबले, मिसेस गोकर्णं येईपर्यंत. पंधरा मिनिटांत त्या ही आल्याच.

मानसी तोंडावर पांघरूण घेऊन भिंतीकडे तोंड करून पडून राहिली. हळू हळू कुजबुजत्या स्वरात सामंतकाकू, ललिताकाकू आईशी बोलत राहिल्या, समजावत राहिल्या. एक एक कळलं तशी, ’बरं झालं मुलगी हातीपायी धडपणे मिळाली आपली आपल्याला’ ह्या निर्णयापर्यंत त्या दोघी आल्या. आई अजून नातेवाईकात काय म्हणतील, कसं तोंड दाखवायचं... हेच अधुनमधुन काढत होती.

शेवटी मानसीला राहवेना... ती उठून बसली.
सामंत काकू धावल्या, ’कसं वाटतय मने? तू काही मनाला लावून घेऊ नकोस, हो... आम्ही बघितलीये तुला लहानाची मोठ्ठी होताना... कोण उगाच कशाला नवर्‍याचं घर सोडून निघून येइल असं..... तू...’

मानसीने त्यांना थांबवलं. ’काकू... हे माझ्या आई-वडलांना पटायला हवय’

’मग? काय चूक सांगतोय? रितीप्रमाणे वागायला नको?... तुझ्या आणि सगळ्यांच्याच भल्याचं सांगतोय, मने...’, आई म्हणाल्या.

’आई... पुन्हा तेच. काय रिती प्रमाणे? कोण ठरवणार रीत? माझा जीव रितीप्रमाणेच जाईल... तेव्हा ...तेव्हा शुद्धीवर येशील की, रितीप्रमाणे गेली पोर... आपल्या घरीच मेली... म्हणून समाधान...’,

सामंतकाकूंनी आवेगाने तिच्या तोंडावर हात ठेवला, ’मने, भरल्या घरात काहीही काय बोलतेस? असं कस अशुभ बोलवतं तुला?’

’काकू, मी अशुभ बोलले? आई-बाबाच बोलतायत, मी फक्तं त्या अशुभाचं फळ सांगितलं... तर मी अशुभ?.. त्यांना मी इथे नको असेल तर...’

’मानसी... मने...’ आई धावली आणि तिनं मानसीला जवळ घेतली.

मानसीने आईच्या मिठीतून सुटायचा प्रयत्नं केला.... तिची धडपड पाहून आईनं अधिकच घट्टं धरली आणि त्याही रडू लागल्या...

सामंतकाकू, ललितावहिनींनी सावरलं कसंतरी दोघींना.

मानसीने आईच्याच पदराने चेहरा पुसला, ’आई... मी सांगते ते ऐक, आधी. लग्नं ठरल्यावर, दोन-तीनदा भेटलो तेव्हा, तेव्हा ही.... मला उगीच वाटलं की अधीरेपणा असेल... पण एका बाजूला असही वाटत होतं की, अगदी दुखवणारच का असायला हवं... साधा किसही...’

’बोलली नाहीस, मने’, आई म्हणाल्या खरं पण त्यांच्याच लक्षात आपलाच हलणारा स्वर आला.

’आई, अशा गोष्टी... अशा गोष्टी... बोलत नाहीत... आणि नाही बोलले तेव्हा काही... मला... मला माहीतच नव्हतं काही...
लग्नं झाल्यावर बाहेर गेलो.... चारच दिवस. मी मैदानी खेळात अनेक बक्षिसं मिळवलीयेत, कराटे शिकलेय, करते... ह्याचा त्यांना आनंद का माहितीये?... सांगायलाही लाज वाटते... पण ऐकच तू.
कारण... कारण अशा मुली... श्शी... छान भरलेल्या असतात म्हणे...
तेव्हाही... श्शी... कसं सांगू... थोडी मारहाण, जबरदस्ती, पाशवीपणा केल्यशिवाय मजा येत नाही, म्हणे... काकू, माझ्या महिन्याचा गोंधळ झाला म्हणून जरा सुटले, नाहीतर...’

ललिताकाकू आणि सामंतकाकू दोघीही शहारल्या.

आईंनी काहीतरी शब्दात मांडायचा प्रयत्नं केला, ’अगं... असतात काही नवरे असे... जरा नवीन नवीन आहे म्हणून... थोड्या दिवसांनी होईल शांत... पण म्हणून तू हात उगारायला नको...’

’काय? तू मारलस नवर्‍याला?’, सामंतकाकू आणि ललिताकाकूचेही डोळे विस्फारले.

’नाही. मी फक्तं माझं संरक्षण केलं. सरळपणे करायचं तर मी तयार आहे... पण वाट्टेल तशी इजा केलेली चालणार नाही असं सांगितल्यावर..... चिडले.
आणि... आणि त्यांनी हात उगारला... आई, काकू देवाशप्पथ सांगत्ये.. मी आधी हात उचलला नाही. माझ्याच नकळत माझे हात उठले आणि त्यांचा हात चेहर्‍यावर पडायच्या आधीच मी हातांच्या कैचीत अडकवला... कराटे! सेल्फ़ डिफ़ेन्सचा पहिला काटा....
हे इतकंच झालय. मी हात उठवला नाही. मी त्यांच्यावर वार केलेला नाही...’
मानसीच्या स्वरातल्या आवेशापेक्षा तिचे डोळे खरं बोलण्याची साक्ष देत होते.

’आई, हे आम्ही परत आल्यावर झालंय... त्यांनी आधी केस धरले माझे... तेव्हाच मी नाही म्हटलं. वाट्टेल तसं दुखवणार असलात तर चालणार नाही म्हणताना माझ्या थोबाडीत देण्यासाठी हात उचलला... मग माझेही हात आपोआप उठले आणि... आणि मी फक्तं अडवला त्यांचा प्रहार, आई, तुझी शप्पथ...
आधी हे माझ्याच नकळत झालं... पण मग मी सावध झाले. हाताचा उपयोग नाही म्हटल्यावर त्यांनी कोपर्‍यातली धुणं वाळत घालायची काठी घेतली हातात.
आई, माझा नवरा मला लग्नानंतर अवघ्या आठव्या दिवशी मारण्यासाठी हातात धुण्याची काठी घेतोय?... सुशिक्षित म्हणवणारं घराणं ना हे? आपल्या कुणाच्यातही न ऐकलेली गोष्टं ही....
घडलं ते मला इतकं आश्चर्यचकित करणारं होतं की... माझं लक्षं उडालं आणि गुढग्यावर बसली काठी...’
बोलता बोलता मानसीने सलवार गुढग्यापर्यंत वर खेचली. अजून मेंदीचा रंग उतरला नाही असे गोर पान पाय... गुढग्यावर टरटरून सुजलेला दाट काळा-निळा व्रण होता...

’अग्गो... ’ म्हणताना ललिताकाकूंच्या डोळ्यात पाणी आलं. आई उभ्या होत्या तिथेच मटकन खाली बसल्या.

’पण पुढचा वार नाही करू दिला, मी. त्यांना कळायच्याही आधी काठी माझ्या हातात होती.... चालती हो असं म्हणून नेसत्या कपड्यांवर बाहेर काढली मला... तू... तुम्ही समजून घ्याल म्हणून इथे आले.... माझं घर समजून.
काय करू आता? माफी मागून जाऊ परत? पाय चाटू त्यांचे? रोज मार खाऊ? असंच जोर-जबरी, घाणेरडं, उबग आणणारं वैवाहिक म्हणायचं म्हणून तसलं आयुष्य जगू?’

’मने, काही सामंजस्याने घेऊया. आम्ही मोठी माणसं त्यांची समजूत घालू गं... पण असं एकदम तोडून टाकून. आमचे संस्कार...’

आई आपलं वाक्य पुरच करू शकल्या नाहीत. मानसीने त्यांना मधेच तोडलं, ’आई, संस्कार म्हणजे नक्की काय म्हणायचय तुला? जे आज्जी-नानांनी तुला शिकवलं तेच ना?... मी सुद्धा माझ्या संस्कारांच्या बळावरच करतेय हे... वयाच्या पाचव्या वर्षापासून कौतुकाने मैदानी खेळ आणि कराटेला कोणी घातलं? प्रसंगी स्वत:ला नवीन कपडे घेतले नाहीत पण कराटेची फी भरत होते बाबा. जपानला जायच्या खर्चासाठी स्वत:च्या बांगड्या मोडणारी तूच ना?
बल्ल्याला आणि मला मुलगा-मुलगी असं वेगळं वेगळं भासवू दिलत नाहीत कधी... ’कराटे शिकायला नव्हे, आता शिकवायला जातेय माझी मुलगी’ हे अभिमानाने सांगता ते खोटं?
फार पूर्वी एकदा बल्याला त्रास देणाऱ्या त्या चाळीतल्या टारगट पोरांबरोबर झुंजले त्यावेळी डोळ्यात पाणी आणून बाबांनीच ना माझी पाठ थोपटली होती?... तुला भय नाही... समर्थ आहेस स्वत:चं संरक्षण करायला, असं बाबाच ना म्हणाले होते तेव्हा?’
स्वत:चं रक्षण फक्तं घराबाहेरच करावं लागेल... घरातले जपतात एकमेकांना... हेच माहीत होतं आजवर.
कायम बाबांनी कसं तुला जपलय ते बघितलय, मी आई... माझे हे संस्कार कसे पुसू ते सांग आधी.... कशाला असल्या समजुतीत वाढवलत मग मला? बोल ना?’

आईसकट सगळ्याच नि:शब्द झाल्या.... इतक्यात इतकावेळ आड दाराबाहेर उभं राहून सगळं ऐकणारे बाबा घरात शिरले, त्यांच्याबरोबर पापाजी, वैद्यकाका, तेलंगही आले.

’मानसी, हे सगळं ऐकल्यावर तुला परत जा म्हणणार नाही. तेव्हढा निर्दय बाप नाही मी. मगाशी बोललो ते त्राग्याचं होतं पोरी..... आजच्या काळात न ऐकलेलं न घडलेलं घडतय आपल्या घरात.... तुझी मोठी आत्त्या... तिचा छळ केला सासरच्यांनी, मी लहान होतो. पण मोठा झाल्यावरही कधी ’ये सगळं सोडून, मी बघतो तुला’..... असं म्हणायला धजावलो नाही...
मोठा धाडसाचा निर्णय आहे तुझा. सगळ्यांनाच जड जाणारय...’

दोन दिवसांत पहिल्यांदाच सरळपणे, मायेनं बोलणारे बाबा बघून मानसीला हुंदका फुटला. तरी तो तसाच जिरवत ती म्हणाली, ’बाबा, हे सगळं खूप दु:ख देणारं आहे... दुर्दैवी आहे. तुम्हा सगळ्यांचं म्हणणं असेल तर मी परत जायला तयार आहे.... अगदी न केलेल्या चुकांची माफी मागूनही...’

सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले, आईंची तिच्या हातावरची पकड घट्ट झाली.
’... पण एकाच अटीवर. त्यांच्या जोरजबरदस्ती आणि मारहाणीला माझ्याकडून विरोध होणार नाही ह्याची मी खात्री देऊ शकत नाही... तो माझ्या रिफ़्लेक्स चा एक भाग आहे...’

’...असं तर, कोणीच...’, नकळत गोकर्णं म्हणायला गेले.

मानसीने मान हलवली,’...बरोबरय, काका. पण माझं हे ठरवून लग्नं आहे. एकमेकांत प्रेम निर्माण होण्यासाठी दोघांनी प्रयत्नं करायला हवेत. त्यांची ही जी काय आहे ती एक विकृती आहे... त्यावर औषधोपचार, मानसोपचार असतील तर ते करून घ्यायला त्यांनी तयार व्हायला हवं... मी मदत करायला तयार आहे.... लग्नं संस्थेवर माझाही विश्वास आहे.... पण अंध विश्वास नाही. बोलाल हे सगळं त्यांच्याशी आणि त्यांच्या घरच्यांशी?’

बाबांनी नकारार्थी मान हलवली... पटूनही हतबल झाल्यावर माणूस हलवतो तशी. ,’मला माहीत नाही. तू करतेयस ते... आपण करतोय ते बरोबर का चूक... माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे आहे हे सगळं...’

इतकावेळ खुर्चीवर बसलेले पापाजी, काठीचा आधार घेत उठले. आपल्याच एखाद्या मोठ्ठ्या काकाच्या किंवा आजोबांच्या अंगावर खेळावं तशी त्यांच्या अंगा-खांद्यावर मानसी खेळली होती. त्यांचे सुखी आणि बाली, दोघेही राखीला न चुकता यायचे.

’चलो अब, अपने अपने घर चलो सब. थकी होगी बच्ची... उसे थोडा आराम करने दो...
दो दो फ़्रंट्सपर लड रही है,.... बाहरवाले बाहरके सही..... लेकीन घरवालोंसेभी मुकाबला?’

बाबांनी चमकून त्यांच्याकडे बघितलं. ’माफ करना, मनूके बाबा. मुझे पता है आपपे क्या गुजरी है... लेकिन कुछ गैर तो नही कर रही बच्ची... अपना सिखाया, धरम पाल रही है, बस्स...
और... खुदको बचाना गैर कबसे हुआ? ऐ?...
एक जमाना था, जब हमारेमे ऐसी बेटियोंकेलिये गुरूसे मन्नत मांगा करते थे... ये तो शेरनी है, शेरनी...’
त्यांच्याकडे अपलक बघणार्‍या मानसीला त्यांच्या डोळ्यात पाणी तरळताना दिसू लागलं.
’अठ्ठे आ, बेटी. मुझे पता है की तेरी बात सही है. लेकिन जब तुम्हारे अपने नही समज पा रहे वहा....’, त्यांना वाक्य पुरं करता आलं नाही. थकल्या खांद्यांनी पुढे होऊन त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला.

मानसीला आता तिथे बसवेना. ती उठून आत निघून गेली.

पापाजींसह खोलीतल्या प्रत्येकाला जाणवलं त्या आशिर्वादाचं रितेपण ... एखाद्या फोलपाटासारखं आपलं पोकळ अस्तित्वं... आणि आत्ताच आत गेलेल्या ठिणगीची धग...

समाप्त.

गुलमोहर: 

आहे खरी शेरनी.
दो दो फ़्रंट्सपर लड रही है,.... बाहरवाले बाहरके सही..... लेकीन घरवालोंसेभी मुकाबला?>> हा मुकाबला जास्त कठीण असतो.

खूप वेगळा विषय, तो पण अतिशय संयतपणे मांडलेला. खूप आवडली ही ठिणगी. मी तुमच्या कथांची वाट पहात असते, इतर अनेक चाहत्यांप्रमाणेच.

धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.
-अनिता

>> बाहरवाले बाहरके सही..... लेकीन घरवालोंसेभी मुकाबला?’>> घरातल्यांशी मुकाबला करावा लागणं हेच अधिक दु:खदायक.. आवडलीच ठिणगी.

खूप आवडली दाद ! नेहमीप्रमाणेच अप्रतिम ...
***************
impossible is just an opinion

अप्रतिम! दाद, वास्तवाला इतक्या जवळुन भेटणारि कथा खुप आवडलि.

खरंय.. Sad आणि अशा गोष्टींचा शेवट काय असतो हे वास्तवात जसं माहित नसतं ...फक्त सोसत राहायचं..पाहत रहायचं असतं..तशीच तू कथा संपवलीस.. उगाच सुखांत किंवा शोकांतिका बनवण्याचा हट्ट न करता ती तशीच सोडून दिलीस.. याला म्हणतात "दाद"!!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

आशू म्हणाते तेच..

सुखांत दु:खांत काहीच केला नाहीस ठोस, ते बरं.. पण जे लिहीलंस ते पोचलंच..
लिहीत रहा..

ग्रेट .....
मुझे पता है की तेरी बात सही है. लेकिन जब तुम्हारे अपने नही समज पा रहे वहा....>>>> किती कटु सत्य आहे हे.

पल्लवी

जियो पापाजी, जियो..!
आणि दाद,
तुला काय लिहु..तु लिहायचं आणि आम्ही वाचायचं, मग तासभर सुन्न होवुन बसायचं !
आतपर्यंत पोचलं, अगदी !

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

छान Happy
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!

लेकीन घरवालोंसेभी मुकाबला?>> हा मुकाबला जास्त कठीण असतो.
>>>>>> खरंय... अशावेळी जर आपल्या माणसांकडुन पाठबळा मिळालं तर बाहेरच्यांचं काही वाटत नाही......
---------------------------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

गोष्ट छान आहे
माझ्या फार जवळ्च्या मुलिच्या जिवनात असेच घडले पण त्यावेळेस मि तीला मदत केली आणी त्या दूष्ट माणसापासुन तीची सुट्का केली .
मी जर समाजाला घाबरले असते तर?
माहीत नाही काय झाले असते!!!!
काहि दिवस समाजात खूप गोष्टी झाल्या पण आता या विषयावर कोणी पण काही बोलत नाहि.
मला वाटते अश्या प्रसन्गी घर्च्यान्नी मुलीला सहारा दयायला पाहिजे.
अश्या प्रसन्गी तीला मानसीक आधाराची फार गरज असते .
आणी समाजाने आपली मानसिकता बदललाय पाहीजे.
मीरा

दाद, चांगलं लिहिलंस..

जोवर आईवडीलांना नक्की काय झालंय हे माहीत नव्हतं, तोवर त्यांनी तिला 'तू परत जा' हे सांगणं ठीक. पण तिच्या जखमा पाहूनही ते 'लोकांचा' विचार करतील, especially जेव्हा त्यांनीच तिला कराटे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, हे काही फारसे नाही पटले.
कदाचित प्रत्यक्ष जीवनात असतील असे लोक, पण मग कथेत तरी तू सुखांत नाही, तरी काहीतरी positive दाखवायला हवं होतंस असं वाटलं.

मनापासून वाटलं ते सांगितलं, please don't mind Happy
------------------------------------------
Times change. Do people??

नुस्त कथा आवडली म्हणायचं आणि गप्प बसायचं. पण ह्या सत्याला सामोरं जाणं महत्त्वाचं. जेव्हा असं समोर घडेल, तेव्हा तिथे लडता यायला हवं . तेव्हाच खरं तर कथा माझ्यापर्यंत पोहोचली असे वाटेल मला.

......................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

सगळ्यांनाच आपली मुलगी सर्वगुणसम्पन्न व्यक्ती असावी असं वाटतं! इथेच गोची असते. कारण एकदा एखादी स्त्री माणूस म्हणून जगायला शिकली की तिला नुसतं स्त्री म्हणून वावरणे कठिण जातं! पण सगळ्यांच्या अपेक्षा "स्त्री" च्याच असतात. स्वत्वाची जाणीव असलेल्या मूली आई बापालही झेपत नाहीत.

दाद, बर्‍याच मानसींची हिच कथा असते ग!

दाद, डोळ्यात पाणी आलं गं..
घरच्यांचा, बाहेरचा पाठिंबा न मिळूनही ठिणगी विझली नाही, हे वाचून छान वाटले.

चांगली मांडलीये.. "ठिणगी" निश्चीत जाणवते...

नेहमी प्रमाणे उत्कृष्ट कथा दाद...अगदी वास्तवाशी निगडीत. वासनेच्या भूतानं हल्ली कोणालाही पछाडायचं शिल्लक ठेवलंय नाही. लग्नाची छाप पडलेल्या नात्याला जेव्हा ते पछाडतं तेव्हा तर सगळं विस्कळीत होतं. आणी हा एक अंत नसलेला संग्राम आहे. ही ठीणगी तशीच राहणार, यापेक्षा वेगळा शेवट या कथेचा होऊच शकत नव्हता.
सुन्न करुन गेली कथा!

****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

दाद तूमच्या कथा नेहमीच डोळ्यात पाणी आणतात.
वास्तव हे कल्पनेपेक्षाही उग्र असतं हेच खरं.
अशा कितीतरीजणी असतील ज्यांच्या घर सोडण्याच्या निर्णयाला घरातलेच पाठींबा देत नसतील. त्यांचा निर्णय कितीही योग्य असला तरिहि. समाज काय म्हणेल, लोकं काय म्हणतील.. ह्याचीच त्यांना चिंता.

शेवटी नियती असते, भोगायचे ते त्या व्यक्तीला भोगावेच लागते. भोग असतात.
पण घर सोडल्यानंतर हि अशा स्त्रीला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. पूढच्या कथेत त्याविषयी लिहा. म्हणजे आम्हाला पण दाद ह्यांची अजुन एक छान कथा वाचायला मिळेल. Happy

धन्यवाद. आभार सगळ्यांचे.
थोड्या फार फरकाने ही घटना, सत्य आहे. फक्तं त्या कथेचा शेवट असा नाही आणि इथे नाही. वास्तवातल्या मानसीच्या बाबतीत काय घडलं ती मूळ कथा होती. त्यातला इतकाच भाग कथा म्हणून इथे टाकला.
ती मूळ कथाही इथे टाकेन.
संग्राम आहेच. पण बदलती परिस्थिती अशी आहे की, नकळत अधिकाधिक पालक अशा ठिणग्यांना जन्मं देतायत आणि जोपासतायत. नवीन पिढी जास्तं समजदार आहे... नव्हे, अशा परिस्थितीला शरण न जाता जमेल तितका प्रतिकार केला पाहिजे ह्याची जाणीव बाळगून आहे. त्यामुळेच मानसीच्या ऑफिसातले बरेचसे कलीग्ज तिला समजून घेतात. घरातले घेतील... पण त्याला वेळ लागणार आहे. किती? कसं होणार हे? हेच त्या मूळ कथेत आहे.
असो... परत एकदा सगळ्यांचे आभार.

दो दो फ़्रंट्सपर लड रही है,.... बाहरवाले बाहरके सही..... लेकीन घरवालोंसेभी मुकाबला?
................आई गं........ हलवलं गं या वाक्यानं.....!!
ठिणगी..... चांगलीच जाणवली.

दाद फारचं छान, वास्तव फारच सुरेख शब्दात मांडलस. प्रत्येक आई वडिलांनी अशा कठीण प्रसंगी आपल्या मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे.

आपलं माणूस अश्या भयंकर मनस्थितीत असतांना "लोक काय म्हणतील?" हाच विचार फक्त करायचा? काही बरंवाईट झालं की पोरीचं नशिबच वाईट! आणि त्या विकृत माणसाला तसाच सोडुन द्यायचा आणखी एका मानसीला उध्वस्त करायला? मला काही समजेनासं झालयं. चिमणीच्या पिलाला माणसाचा हात लागला तर त्याला टोचुन मारून टाकतात म्हणे. माणसाचा स्पर्श व्हावा की नाही हा त्या पिलाचा चॉईस नसतो तरीसुध्दा! त्यांच लॉजिक मला माहिती नाही. माणसांत पण असंच असतं का? Sad

दाद तुमचं लिखाण सुंदरच!

"आओ एक बात मै कहुं तुमसे,
जाने फिर कोई ये कहे ना कहे|
तुमको अपनी तलाश करनी है,
हमसफर कोई रहे ना रहे|
तुमको अपने सहारे जिना है,
ढुंढती कोई आसरा रहो|"

दाद, नेहमीप्रमाणेच उत्तम कथा. डोळ्यात टच्चकन पाणी आलं वाचताना.

भरपूर लिहीत रहा. तुझ्या कथा, ललित वाचायला खूप आवडतं...

this is true. still in Indian society parents will think more for society.
they have to change their mindset
but really very heart touching story

सगळ्यांनाच आपली मुलगी सर्वगुणसम्पन्न व्यक्ती असावी असं वाटतं! इथेच गोची असते. कारण एकदा एखादी स्त्री माणूस म्हणून जगायला शिकली की तिला नुसतं स्त्री म्हणून वावरणे कठिण जातं! पण सगळ्यांच्या अपेक्षा "स्त्री" च्याच असतात. स्वत्वाची जाणीव असलेल्या मूली आई बापालही झेपत नाहीत.
>>>
हे सत्यच! कारण सासरचे लोक एका स्त्रीला सुन म्हणुन आणतात, ति एक पुर्ण व्यक्ती असणार नाही आणि स्वताच अस्तित्व तिला असणार नाही हे मनात ठेवुनच ते वागतात आणि घरोघरी मग अशा ठिणग्या पडतात कायमच !!???
दाद, खुपच छान आहे ही पण कथा !!!!!!!
Happy

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

स्वत्वाची जाणीव असलेल्या मूली आई बापालही झेपत नाहीत
>> अगदी बरोबर!!! आणि अशा मुली सासरकडच्याना तरी कशा झेपतील?
--------------
नंदिनी
--------------

उत्तम! मस्त कथा आहे. एवढा नाजुक विषय असूनही अतिशय योग्य प्रकारे मान्डला आहे. धन्यवाद.

दाद,
मला या कथेत, तिच्या आईवडिलाना, " तूमची मुलगी नवर्‍याला मारहाण करते " असे कुणाकडून तरी कळते. त्यावर त्यांच्या प्रतिक्रीया. मग सत्य परिस्थिती कळणे, अशी रचना जास्त परिणामकारक झाली असते, असे वाटते.

Pages